7 दिवसात स्पष्टीकरण द्या अन्यथा दंडात्मक कारवाई होणार
जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे असलेल्या प्रकाशचंद जैन संस्थेच्या आवारात शेकडो ब्रास वाळू व मुरुमाचा अवैध साठा करून ठेवण्यात आलेला होता. या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वापरल्या प्रकरणी अखेर प्रकाशचंद जैन संस्थेला ५ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे, अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
मागील आठवड्यात प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी पळासखेडा बुद्रुक शिवारात शासनाची पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे २१४६ ब्रास मुरूम व १०६२ ब्रास वाळूचा वापर व साठवणूक केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला. सदर गौण खनिज हे अवैध पद्धतीने उत्खनन आणि साठा करून ठेवल्याचा समोर आले आहे. त्यावरून प्रकाशकांद जैन संस्थेला ५ कोटी १३ लाख १२ हजार ५८० रुपये दंड करण्यात आला आहे. या संदर्भात संस्थेला नोटीस बजावण्यात आली असून बजावलेल्या नोटिसीनुसार सात दिवसांत संस्थेने स्पष्टीकरण न दिल्यास कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी म्हटले आहे.
पळासखेडा बुद्रूक ग्रा.पं.सह नगरपरिषदेचे बनावट दाखले व स्वाक्षऱ्या करून शाळा, महाविद्यालयांना परवानगी मिळवल्याचा तसेच जैन संस्थेने मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वापर केल्याचीही तक्रार पहूरच्या ललित लोढा यांनी केली आहे.
चेअरमन फरार -पोलिस हतबल!
प्रकाशकांद जैन संस्थेचे चेअरमन आधीच मारहाणीच्या प्रकरणात गेल्या महिन्याभरापासून फरार आहेत. त्याचा शोध जामनेर पोलिस घेत आहेत.अशातच राजकुमार कावडिया यांच्या अडचणी वाढत आहे. त्यांनी सुरु केलेली प्रकाशचंद जैन संस्थेतील काही प्रकल्प ही विना परवानग्या आणि खोटे दाखले घेऊन सुरू केल्याची ओरड आहे. एवढ सगळं घडूनही प्रशासनाच्या हाती अद्याप राजकुमार कावडिया कसे लागत नाहीत, किंवा त्यांना अभय दिला जातोय का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे.
+ There are no comments
Add yours