विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील जवळपास ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, दिनांक २८ जून २०२४ आणि दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे. पुढे त्यांनी यापूर्वीच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
नेमकं कोणत्या महिलांना राज्य सरकारकडून अपात्र ठरवण्यात आलं आहे, ते पाहूयात.
5 लाख महिला ठरल्या अपात्र
महिला वा बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.”
पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचं विवरण दिलंय. त्यांनी दिलेल्या विवरणानुसार,
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – 2 लाख 30 हजार
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1 लाख 10 हजार
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – 1 लाख 60 हजार
एकूण अपात्र महिला – 5 लाख
“सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे,” असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
+ There are no comments
Add yours