जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री तरीही विकास थंडावला!

जळगाव जिल्ह्यात नागरी सुविधांची
७१० विकास कामे धिम्या गतीने !

तिघ मंत्र्यांना काहीही ‘करणे’ नाही; ‘घेणे’ मात्र भरपूर
‘जळगाव नागरिक मंच’ कडे सविस्तर अहवाल …

Ⓒदिलीप तिवारी, जळगाव
🅕dilipktiwarijalgaon

प्रलंबित कामांमध्ये … सर्वाधिक विषय रेल्वेशी संबंधित
इतर प्रलंबित कामांमध्ये … रेंगाळलेले विषय महावितरण / बीएसएनएल / एनएचआय / महसूल (भूसंपादन / जागा मागणी) / सिंचन प्रकल्प / पुनर्वसन / क्रीडा संकुल / विमानतळ / एमआयडीसी

जळगावकर आणि जिल्ह्यातील नागरिकांनो ! … तुमच्या भागातील विकासाची विविध कामे कोणता पुढारी पूर्ण करेल? कधी पूर्ण करेल ? या विश्वासावर विसंबून राहू नका. आता स्वतःच गाव – शहरस्तरावर एकत्र येऊन काही तरी आंदोलन करा. जळगाव जिल्ह्यातील विकास कामांचे विषय ‘एखादा पुढारी’ कागदपत्रांची झंझट पूर्ण करून व पुरेसा निधी वेळेत आणून पूर्ण करून दाखवेल अशी खात्री नाही. राज्याच्या विधानसभेत काही जणांची ‘लाॅटरी’ लागली. मुंबईतील बडे नेते मतदानाच्या आदल्या रात्री सुद्धा विचारत होते, ‘तुला गरज आहे का ? आणखी पाठवू का ?’ जळगावकर आणि जिल्हावासी … २० कोटी रूपये खर्च करून निवडून येणे ही गंमत आहे का ? ‘दिया है तो वसूल करना पडेगा !’

स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी, स्व. के. एम. बापू पाटील, स्व. जे. टी. दादा महाजन, श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात लोकवर्गणीचा हिस्सा भरून विकास कामे करायचे दिवस गेले. आता हजार कोटी रूपये खर्चाचा ‘कुंभमेळा’ पाहून ‘लोकनेता’ होऊन नाचायचे दिवस आहेत. जळगाव शहरात वेगळी ‘चारचाकी’ आणि मुंबईत ‘मर्सिडीज’ फिरवायचे दिवस आहेत. मतदार संघात कशाला हवा विकास ? मतदानाच्या अगोदर आहेत फडणवीस / शिंदे / पवारदादा आर्थिक भार उचलायला !

Ⓒदिलीप तिवारी, जळगाव
🅕dilipktiwarijalgaon

जळगाव शहरासह जिल्ह्यातील विकास कामांची अवस्था थांबलेली / रेंगाळलेली विकास कामे अशी आहे. अशी किती विकास कामे रेंगाळलेली असावीत याचा पाठपुरावा ‘जळगाव नागरिक मंच’ या नागरी व्यासपीठावरून केला असता प्रलंबित व रेंगाळलेल्या जवळपास ७१० विकास कामांची यादी समोर आली. खरे तर कागदपत्रे पूर्ण करणे / भूसंपादन / सरकारी मोबदला / नियम – अटी वगैरेंसाठी विकास कामे रेंगाळतात. पण जळगाव जिल्ह्यात अशी विकास कामे वर्षानुवर्षे रेंगाळायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुढाऱ्यांच्या रूपात बेजबाबदार, बेमुर्वतपणा आणि बेफिकिरी वाढली आहे. त्यामुळे सरकारी फायलींमध्ये रेंगाळलेल्या कामांची यादी ७१० पर्यंत पोहचली आहे. गंमत म्हणजे, जसे पुढारी तसेच पत्रकार संपादक आहेत. त्यांनाही विकास कामांचा पाठपुरावा करावा अशी भूमिका घेता येत नाही. कारण आता बातमी नाही तर ‘इव्हेंट प्रायोजित पॅकेज’ चा जमाना आहे. पैसा देणाऱ्या पुढाऱ्यांच्या विरोधात काही लिहाये तर आहे युनीट हेड ‘धंदा कम हो रहा है!’ हे दरडावून सांगायला.

जळगाव शहर आणि जिल्ह्यात रेंगाळलेल्या विकास प्रकल्पातील काही तपशील असे – वीज प्रकल्पांशी संबंधित कामे ५७. यात बहुतांश कामे दीपनगर वीज निर्मिती केंद्र आणि वीज पुरवठा केंद्राशी संबंधित आहेत. १५ कामे बीएसएनएलशी संबंधित आहेत. बीएसएनएलचा बोजवारा जळगाव शहरात वाजला आहे. ग्रामीण भागात बीएसएनएल टाॅवर उभे राहात आहे. काही ठिकाणी ग्रामस्थ विरोध करीत आहेत. बीएसएनएल जर गेले तर खासगी मोबाईल कंपन्या चड्डी काढून काॅल / डेटा चार्ज घेतील. राष्ट्रीय महामार्गशी संबंधित ४१ विषय आहेत. यात भूसंपादन करणे सोबत नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढणे हा विषय आहे. १५० विषय रेल्वेशी संबंधित असून त्यात जळगाव – मनमाड रेल्वेमार्गाशी संबंधित १०० वर विषय भूसंपादनाचे आहेत. ७७ वर विषय महसूलची जागा मागणीचे आहेत. ७ विषय मेडिकलहबशी संबंधित आहेत. १२९ विषय धरण / पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित असून शेळगाव, हतनूर, पाडळसरे प्रकल्पासह उपसा सिंचन योजनांचे विषय आहेत. २० विषय पुनर्वसनाशी संबंधित आहेत. ७ विषय अमृत योजनेशी संबंधीत आहेत. ४१ विषय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणशी संबंधित आहेत. २८ विषय क्रिडा संकुलाचे आहेत. ६ विषय जळगाव विमानतळाचे आहेत. ५ विषय इ बससेवेचे आहेत. ही बस जळगाव शहरात सुरू होईल. ६ विषय औद्योगिक वसाहतींचे आहेत.

जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असून देखील जिल्ह्यातील अनेक विकास कामे थंडावली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तीनही मंत्री प्रलंबित कामांकडे लक्ष देतील का आणि विकास कामा पूर्ण कधी होतील याची शाश्वती देतील का हा प्रश्न जळगावकर विचारत आहे.

विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यात ‘मोहाची दारू’ तयार करण्याचा प्रकल्पही प्रलंबित आहे. जेथे ‘देशी व विदेशी’ जोरात विक्री होते तेथे आमच्या आदिमवासींच्या या ‘गावठी’ प्रकल्पाला कोण आडवे येत आहेत ?

वरील सर्व विषय वाचून शहर व जिल्हा विकास या विषयावर नागरिकांनी विचार करून कृती करण्याची गरज आहे ….

Ⓒदिलीप तिवारी, जळगाव
🅕dilipktiwarijalgaon

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours