राज्यात विक्रमी मान्सून धडक — ६८ वर्षांचा विक्रम मोडला;

गिरीश महाजन मंत्रालयात परिस्थितीवर नजर, उपमुख्यमंत्री शिंदे महापालिका नियंत्रण कक्षात हजर

मुंबई | २६ मे २०२५ | विशेष प्रतिनिधी

राज्याच्या हवामान इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे.

इतिहासातले सर्वात लवकर मान्सून आगमन — संदर्भीय नोंदी
गेल्या काही दशकांतील सर्वात लवकर मान्सून आगमन खालीलप्रमाणे:
१९५६: २९ मे
१९६१: २९ मे
१९७1: २९ मे
२०९१ ते २०२४ पर्यंत: बहुतांश वेळा ७ जून ते १३ जून दरम्यान

२०२५: २६ मे (सर्वात लवकर!)

ही नोंद केवळ मुंबईसाठीच नव्हे तर पश्चिम किनारपट्टीसाठीही एक ऐतिहासिक बदल मानली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि बदललेली वाऱ्यांची दिशा यामुळे यंदाचा मान्सून गतीने पुढे सरकला.

पावसाचा पहिला जोर: मुंबई जलमय

२६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० यावेळेतील पावसाची नोंद:

कुलाबा: १०५.२ मिमी

सांताक्रूज: ५५ मिमी

मुंबईत अनेक सखल भाग जलमय झाले असून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ आणि परिस्थिती शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
आपत्ती व्यवस्थापन सज्ज — गिरीश महाजन मैदानात उतरले

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीश भाऊ महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज सकाळीच मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली.

विशेष म्हणजे, महापालिकेच्या नियंत्रण कक्षात उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा आढावा घेतला.

गिरीश महाजन यांनी सांगितले —

“सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, हीच विनंती.”

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
अनावश्यक प्रवास टाळावा
पाण्याच्या प्रवाहात किंवा साचलेल्या भागात जाणे टाळावे
समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणे पूर्णतः टाळावे

हवामान खात्याच्या सूचना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे

पूर्वीचा अनुभव, यंदाची तयारी
२०१९ साली मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली होती. ट्रेन सेवा बंद पडली होती, शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या, आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र यंदा गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, पहिल्याच दिवशी योग्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

सरकार सज्ज, जबाबदारी सर्वांची

राज्य सरकारने यंत्रणा तातडीने कामाला लावली आहे. मात्र पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीतून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours