मुंबई (प्रतिनिधी) — राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पहिल्या टप्प्यात २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. यानिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिका यांची मुदत संपली आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत
31 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यासाठी 13 हजार कंट्रोल युनिट्स उभारण्यात आल्या आहेत. विभागनिहाय निवडणुका पुढीलप्रमाणे: कोकण-17, नाशिक-49, पुणे-60, संभाजीनगर-52, अमरावती-45 आणि नागपूर-55.
यंदा उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे — अ वर्ग नगरपालिकांसाठी अध्यक्षपदाची मर्यादा 15 लाख रुपये, तर क वर्गासाठी 7 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी नवीन मोबाईल अॅप सुद्धा तयार करण्यात आले असून दुबार मतदान टाळण्यासाठी विशेष चिन्ह व डिक्लरेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
+ There are no comments
Add yours