जिल्ह्यातील नव्या आणि जनतेच्या हक्काचा आवाज बनणाऱ्या “स्पंदन महाराष्ट्राचे” या साप्ताहिक वृत्तपत्राचा भव्य प्रकाशन सोहळा 15 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या या ऐतिहासिक दिवशी जळगाव येथे आयोजित कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, राज्याचे पालकमंत्रीतथा ग्राम विकास मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीत आणि ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते “स्पंदन महाराष्ट्राचे” चा पहिला अंक अनावरण करण्यात आला.
या वेळी खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “ग्रामीण भागातील खऱ्या समस्या, शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न, तसेच स्थानिक मुद्द्यांवर निःपक्षपाती पत्रकारिता हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. ‘स्पंदन महाराष्ट्राचे’ या भूमिकेत यशस्वी ठरेल, असा मला विश्वास आहे.”

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देत, “जनतेचा आवाज दाबला जाऊ नये, यासाठी अशा साप्ताहिकांची गरज आहे,” असे सांगितले.
आमदार राजू मामा भोळे यांनी, “जामनेर आणि परिसराच्या विकासयात्रेत हे साप्ताहिक सकारात्मक भूमिका बजावेल,” असे मत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकशाहीतील माध्यमांची जबाबदारी अधोरेखित करत, वाचकांनीही सत्य, तटस्थ आणि रचनात्मक पत्रकारितेला साथ द्यावी, असे आवाहन केले.
प्रकाशन सोहळ्यास विविध राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
साप्ताहिक स्पंदन महाराष्ट्राचे वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात स्थानिक प्रश्नांवरील लेख, प्रेरणादायी कथा, राजकीय गणित, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित माहिती वाचकांना वाचायला मिळाली.
+ There are no comments
Add yours