ढिसाळ नियोजनाचा कार्यक्रमाला फटका : वृद्धांनी व्यक्त केली नाराजी
जामनेर: शहरात आज मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींना व वयोवृद्ध नागरिकांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या नागरिकांना कमी ऐकू येते अशांना थेट जागेवर करण्यात देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष फाऊंडेशन आणि गिरीश महाजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे भाजपचे पूर्व अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुसरीकडे मात्र कार्यक्रमाच्या नियोजनावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला. 10 वाजेचा कार्यक्रम 12 वाजता सुरू करण्यात आला त्यानंतर देखील साहित्य वाटप करण्यासाठी नियोजनाचा अभाव असल्याचं दिसून आले.
कार्यकर्त्यांच ढिसाळ नियोजन
जामनेर येथील एका मंगल कार्यालयात दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांना कर्ण यंत्र, व्हीलचेअर, काठी, मानेचा बेल्ट, कंबरेचा बेल्ट असे उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. मात्र मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली नाही, असे असताना देखील स्थानिक राजकारण्यांनी देखील कार्यक्रमाला उशिरा हजेरी लावली. नागरिकांना 10 वाजेची वेळ देण्यात आल्यानंतर कार्यक्रम प्रत्यक्षात मात्र 12 वाजता सुरू करण्यात आला.तसेच प्रत्यक्षात साहित्य वाटप करतांना देखील कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला. ऐनवेळी नियोजन फिस्कटल्याने नागरिकांना बराच वेळ साहित्यासाठी वाट बघावी लागली.
कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करणे गरजे होते, साहित्य वाटप करताना सुरवातीला फोटो सेशन करण्यात आले. त्यानंतर मात्र स्थानिक नेते, पदाधिकारी , आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.त्यामुळे अनेक वृद्ध नागरिकांना बसून रहावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. जवळपास तासभर गोंधळ उडाल्यानंतर साहित्य वाटपास सुरवात झाली.त्यात देखील अनेकांना दिव्यांग सर्टिफिकेट नसल्याने निराशा घेऊन परतावे लागले, तर अनेकांना कानाचे मशीन फिट न बसल्याने निराशा घेऊन परतावे लागले. संपूर्ण कार्यक्रमात नियोजनाचा आभाव असल्याने नागरिकांची हिरमोड झाली.
+ There are no comments
Add yours