मराठा समाजातील एक विवाह ऐसा भी….

चुकीच्या प्रथा-परंपरांना फाटादेणारा कौतुकास्पद लग्नसोहळा

लग्नसोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी, प्रथा-परंपरा सध्या नव्याने चर्चेत आल्या आहेत. आपल्याच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील हगवणे प्रकरणाचे निमित्त झाले आणि संपूर्ण मराठा समाजच टीकेचे लक्ष्य बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विषय ट्रेंडिंगला असल्याने सोशल मिडीयावरही जिथे-तिथे याच विषयाचे कुरण सुरू आहे. सरसकट नसला तरी मराठा समाजातील तालेवार घराण्यांमधील बहुतांश लग्नसोहळ्यांमध्ये होणारी करोडो रूपयांची उधळपट्टी हा सर्वाधिक कळीचा तितकेच चिंतेचा विषय आहे.
जोरात लग्न लावायचे, या मानसिकतेतून अशा लग्नसोहळ्यांमध्ये नको इतकी प्रतिष्ठा पणाला लावली जाते. त्यासाठी दोन्ही बाजूकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. इतक्या खर्चाची खरोखर गरज आहे का, याचा विचारच केला जात नाही. कोणीही कितीही टीका केली तरी त्याला फारशी किंमत दिली जात नाही. लग्नपत्रिकेत जाहीर केलेली वेळ पाळलीच जात नाही. त्यामुळे गोरज मुहुर्त नावालाच राहिला आहे. नियोजित वेळेपेक्षा तासभर उशीर होत होता, तोपर्यंत पाहुणेमंडळींकडून फारशी कूरकूर केली जात नव्हती. आता मात्र लग्नाला तीन तास, चार तास उशीर होणे, हे नेहमीचे झाले आहे. सायंकाळी सहाचे लग्न असताना रात्री दहा वाजता ते लावण्यात आले, अशी अनेक उदाहरणे सांगितली जातात.


लग्नातील प्रचंड सत्कार सोहळे हे कायमच डोकेदुखीचा विषय ठरलेले आहेत. व्यासपीठावर तुडुंब गर्दी असते. मान्ववरांचे लेबल लावून शेकडो नावांचा पुकारा केला जातो. नेतेमंडळींचे सत्कार, पै पाहुण्यांचे मानपान अशी भली मोठी यादी असते. स्वागत, आशिर्वाद, आभार अशा गोंडस नावाखाली भाषणांची चढाओढ लागते. या सगळ्या प्रकारात वेळेचा प्रचंड अपव्यय होतो. लग्नासाठी दोन्ही कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन वेळेत आलेल्या सामान्य नागरिकांच्या उपस्थितीची दखल तर घेतली जात नाहीच, हा सगळा तमाशा तासनतास सुरू असतो, तो हताशपणे पाहण्याशिवाय हातात काहीच नसते. हे कमी म्हणून की काय, मंगल कार्यालयाबाहेर वाहतुकीचा प्रचंड बोजवारा उडालेला असतो. शेकडो नागरिक अडकून पडलेले असतात. हजारोंना मनस्ताप होतो. पण, कोणालाही कसलेही सोयरसुतक नसते.
अशा प्रतिकूल परिस्थितीत अलिकडच्या काळात असे शेकडो-हजारो सोहळे पार पडले असतील. कोणी निंदा, कोणी वंदा चुकीच्या पध्दतीने होणाऱ्या अशा सोहळ्यांची ही वाटचाल सुरूच होती. हगवणे प्रकरणानंतर सगळ्या स्तरातून मराठा समाजावर कठोरपणे टीका होऊ लागली. इच्छा असो किंवा नसो, या टीकेची दखल घेणे सर्वांना भाग पडले आहे. त्यातून पुणे-पिंपरीत बैठकाही सुरू झाल्या. त्याचे परिणाम यापुढील काळात दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
त्याआधीच सध्याच्या नकारात्मक वातावरणात आशादायी ठरू शकेल, असा मराठा समाजातील असा एक विवाह सोहळा पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडला, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अतिशय शिस्तबध्द, नियोजनबध्द आणि चुकीच्या प्रथा- परंपरांना फाटा देणारा हा विवाह सोहळा रावेतच्या समीर लॉन्स येथे संपन्न झाला. ज्याची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. सोमवारी, २ जूनला आकुर्डीतील व्यावसायिक गोरख भालेकर यांच्या मुलाचे तन्मयचे लग्न याच भागातील फूलचंद गोडसे यांच्या मुलीशी (ऋतुजा) झाले. दुपारी ११ वाजून ५९ मिनिटांचा मुहुर्त होता. मुहुर्ताची नेमकी वेळ साधून मंगलाष्टके सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये विवाह संपन्न झाला. कुटुंबप्रमुख या नात्याने प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व्ही. एस. काळभोर आणि दोन्हीकडील जवळचे मोजकेच नातेवाईक यावेळी उपस्थित होते. मराठीचा सुपरस्टार अभिनेता भरत जाधव यांनी यावेळी आवर्जून हजेरी लावली होती. कारण, दिशा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून भालेकरांचा भरत जाधव यांच्याशी बऱ्याच वर्षांपासून स्नेह आहे. त्या प्रेमातून ते आले होते. भरत जाधव आणि काळभोरांच्या हस्ते भालेकरांचे जावई म्हणून शिवराज काटे यांचा एकमेव घरगुती सत्कार यावेळी झाला.
याच दिवशी, याच ठिकाणी संध्याकाळी सातपासून स्वागत समारंभ (रिसेप्शन) होता. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार अमर साबळे, राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, त्रिंबकराव भिसे, माजी महापौर संजोग वाघेरे, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, सचिन साठे, राहूल कलाटे, नाना काटे, सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, रवी लांडगे, राजाभाऊ गोलांडे, शांताराम भालेकर, पिंपरी पालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे तसेच मोठ्या संख्येने आजी-माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंडपात कोणतेही कर्कश्य संगीत नाही. एकही सत्कार झाला नाही. कोणाच्याही नावांचा पुकारा नाही. कोणालाही अतिरिक्त महत्व नाही की कोणाकडे दुर्लक्ष नाही. मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील पै पाहुणे आले होते. नेहमीच्या लग्नसोहळ्यांमध्ये काय घडते, याचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्यांच्या दृष्टीने भालेकर-गोडसे हा विवाहसोहळा निश्चितपणे वेगळा होता. सत्कार समारंभ, मानपान आणि नको त्या सर्वच गोष्टींना पूर्णपणे फाटा देण्यात आला होता. अतिशय शिस्तीत, वेळेत आणि नियोजनबध्दपणे पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची नोंद समाजाने घेतली पाहिजे, असे वाटते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours