रिक्षा आणि ट्रक च्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू
जामनेर
जामनेर–भुसावळ हा तालुक्यातील प्रमुख वर्दळीचा मार्ग असून, गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. अर्धवट सोडलेले काम, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि एकाच बाजूने सुरू असलेली वाहतूक यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. या निष्काळजीपणाचा बळी म्हणून काल आणखी एका तरुणाचा जीव गेला आहे.
भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी सुमारे दोन वाजता नाना धाब्याजवळ रिक्षा व ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक रवींद्र उर्फ बबलू भोईटे (रा. शास्त्रीनगर दामले प्लॉट, जामनेर) अपघातात गंभीर जखमी झाले होते. स्थानिकाच्या मदतीने त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक आलेल्या या दुर्घटनेने तभोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराला या अपघातास जबाबदार ठरवत संताप व्यक्त केला आहे.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न पुढे येत आहेत :
- रस्त्याचं काम इतक्या संथ गतीने का सुरू आहे?
- अपघात टाळण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था का करण्यात आली नाही?
- वाहतूक नियंत्रणासाठी कोणते उपाय योजले गेले?
- एका तरुणाचा बळी जाण्यास जबाबदार कोण?
नागरिकांच्या मागण्या
स्थानिक नागरिकांनी तातडीने पुढील मागण्या केल्या आहेत :
◆ रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यायावे.
◆ वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा.
◆ अपघातग्रस्त कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई मिळावी.
◆ जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
सोशल मीडियावर आवाज
या घटनेनंतर #सुरक्षितरस्ता_जामनेर हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. तरुणांनी व नागरिकांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे.
“हा रस्ता उद्या आणखी किती जिवांचा बळी घेणार?” असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा मार्ग सुरक्षित न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
+ There are no comments
Add yours