दुर्लक्षाचा कळस – दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर धोका
जामनेर तालुका : भागदरा गावात आज सकाळी समोर आलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण गाव हादरले आहे. अनेक घरांच्या नळातून येणाऱ्या पाण्यात मृत पक्ष्यांचे सांगाडे, पंखांचे अवशेष आणि दुर्गंधीयुक्त कचरा दिसून आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. पाण्याची स्थिती एवढी भयावह आहे की, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार “हे पाणी पिणे दूरच, हातालाही लावण्याजोगे नाही.”
ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार, गावातील पाण्याची टाकी अनेक महिन्यांपासून स्वच्छ केलेलीच नाही. टाकीत पक्षी किंवा इतर प्राणी पडून सडलेल्या अवस्थेत राहिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे दूषित होत असून मुलांचे, वृद्धांचे आणि सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या आणि पाण्यातून पसरणाऱ्या गंभीर आजारांचा धोका वाढला आहे, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तत्काळ कारवाईची मागणी करत गावकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे —
“टाकीची स्वच्छता नियमित करावी, याबाबत वेळापत्रक जाहीर करावे आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी!”
भागदरा गावातील हा प्रकार ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा भयावह नमुना मानला जात आहे. आता प्रशासकीय पातळीवर कोणती कारवाई होते, दोषींवर लगाम बसतो का, आणि गावाला सुरक्षित पाणी कधी उपलब्ध होते— हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
+ There are no comments
Add yours